जळगाव (जामनेर) : जळगावमध्ये भीषण अपघातात ४ मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना घडली आहे. जामनेरहून पहूरकडे दुचाकीवरून परतताना पिंपळगाव गोलाईजवळ तीव्र वळणावर भरधाव मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मालवाहू चालक गाडीसह पसार होण्याच्या प्रयत्नात होता; पण ग्रामस्थांनी रोखले.
अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश सुरेश लोखंडे, अजय फकिरा साबळे आणि रवी सुनील लोंढे अशी अपघातात मृत झालेल्या चार तरूणांची नावे आहेत. हे चारही जण जामनेर शहरातील राहणारे मित्र होते. रात्री सव्वा बारा वाजता जामनेरहून निघाले होते. पिंपळगाव गोलाईजवळील तीव्र वळणावर पहूरकडून जामनेरकडे येणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडकेने दुचाकीचे तुकडे-तुकडे झाले तर चौघेही रस्त्यावर दूर फेकले गेले. घटनास्थळीच त्यांचा अंत झाला.
मालवाहू वाहनाचा चालक जुबेर कुरैशी (वय ३२, रा. भुसावळ) हा किरकोळ जखमी झाला. तो गाडी सोडून पळण्याचा प्रयत्न करत होता, पण स्थानिकांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पहूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. चारही मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी दाखल करण्यात आले आहेत.
पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटील यांनी सांगितले, “मालवाहू चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाचा रक्ताचा नमुना घेऊन अल्कोहोल टेस्टसाठी पाठवला आहे. चौघेही तरुण मद्यप्राशन करून आले होते की नाही, याचाही तपास करत आहोत. अपघाताचे नेमके कारण स्पीड आणि वळण यांचा संयोग दिसतो आहे.” अपघाताची बातमी कळताच जामनेर शहरावर शोककळा पसरली.


