Pune News: पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये झालेल्या महिलेवरील अत्याचाराच्या भयानक घटनेनंतर नऊ महिन्यांनी, अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने IPS दर्जाच्या अधिकाऱ्याची मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली असून, गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेले हे पद आता भरले जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. प्रवाशांच्या सुरक्षिततेत सुधारणा करण्यासाठी आणि एसटी व्यवस्थेवर जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची प्रशासकीय सुधारणा मानली जात आहे.
स्वारगेट घटनेनंतर हालचाल
२५ फेब्रुवारी रोजी स्वारगेट बस डेपोमध्ये पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये २५ वर्षीय महिलेवर दोनदा बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. आरोपी दत्तात्रय गाडे याला ड्रोन, श्वानपथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने १२ तासांच्या शोधमोहीमेनंतर अटक करण्यात आली. या घटनेनंतर राज्यभर संताप उसळला. जनतेच्या निषेधामुळे आणि विरोधकांच्या दबावानंतर सरकारवर ठोस कारवाईची मागणी वाढली. त्यानंतरच मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी हे पद तत्काळ भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारची ठोस पावले
परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार, गृह विभागाने या पदासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीला हिरवा कंदील दिला आहे. मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ही केवळ नियुक्ती नसून संरचनात्मक सुधारणा आहे. स्वारगेट प्रकरणाने प्रणालीतील कमतरता उघड केल्या. प्रवाशांची सुरक्षा ही तडजोडीची गोष्ट नाही.
हेही वाचा – Pune Weather: पुणेकरांनो हिवाळा जवळ आलाय! 10 नोव्हेंबरनंतर पुण्यात थंडी वाढणार!
सुरक्षा उपायांची नवी चौकट
राज्यात उपायांची दररोज ६० लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा देणाऱ्या एमएसआरटीसीसाठी ही नियुक्ती निर्णायक ठरणार आहे. नव्या अधिकाऱ्यांकडे खालील जबाबदाऱ्या असतील –
- सर्व डेपोंमध्ये सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे
- चालक आणि वाहकांची नियमित पार्श्वभूमी तपासणी
- कर्मचाऱ्यांना संवेदनशीलता प्रशिक्षण देणे
- महिला सुरक्षा प्रोटोकॉल राबवणे
- सीसीटीव्ही आणि जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली लागू करणे
- आपत्कालीन हेल्पलाइनशी थेट जोडणी करणे
- महिला आणि बालविकास विभागासह स्थानिक पोलिसांशी समन्वय ठेवून राज्यभरात एकसंध सुरक्षा मॉडेल लागू करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्याकडे असेल.
- जनतेचा विश्वास परत आणण्याची आशा
- एमएसआरटीसी कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
स्वारगेटसारख्या घटनांनी लोकांचा सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास डळमळीत झाला होता. आता आयपीएस अधिकारी थेट नियंत्रणात आल्याने शिस्त, पारदर्शकता आणि सुरक्षा वाढेल, असे एमएसआरटीसीच्या एका वरिष्ठ संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले. दीर्घकाळ रिक्त राहिलेल्या या महत्त्वाच्या पदाची नियुक्ती म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने उचललेले निर्णायक पाऊल आहे. एमएसआरटीसीला सुरक्षित, जबाबदार आणि विश्वासार्ह वाहतूक प्रणाली म्हणून पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसत आहे.


