Pimpri Chinchwad Municipal Election 2026: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या अनेक तऱ्हा सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळत आहेत. तर, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. मात्र, ही चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याने पुन्हा ह्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या. आता, स्वत: अजित पवार यांनीच दोन राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली.
पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली आहे. मविआ वगळता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने पहिली बैठक झाल्याची माहिती आहे. खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांसोबत झालेल्या तीन गुप्त बैठकांमध्ये अजित पवारांची बरीच चर्चा झाली होती. अखेर या बैठकांना आता मूर्तरूप आल्याचं दिसून येत आहे. उद्याच या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर होऊ शकते.
अजित पवारांची भाजपवर टीका
अजित पवार यांनी पिंपरीतील भाषणात दत्ता काका साने यांच्या आठवणी जागवल्या आहेत. महापालिकेत रिंग चालली आहे, वारे माप खर्च चालला आहे. जॅकवेल निविदा 30 टक्क्यांनी वाढविण्यात आली. कुदळवाडीत जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. संत पीठात वारकरी घडवायचे होते, मात्र तिथे संत पिठात सीबीएससी स्कूल सुरू केली आहेत. संत पिठात गीता रामायण शिकवण्यात येत नाही, संत पिठात कंपनी सुरू केली. संत पीठ हे फक्त नावापुरतं राहिलं आहे, असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता भाजपवर टीका केली. जे ठरलं होतं ते का थांबवण्यात आलं, वेगळ्या पद्धतीच राजकारण जे चालल ते थांबवायला हवं. पिंपरी चिंचवड शहरातील माझ्या 25 वर्षांच्या राजकारणात मी कधी कर्ज काढलं नव्हतं. आज महापालिकेवर कर्ज झालं आहे, हे पाप कोणाच? असा सवाल करत अजित पवार यांनी नाव न घेता महेश लांडगे यांच्या कारभाराकडे लक्ष वेधलं. शहरात टँकर माफिया चालत आहेत, मुठभर लोकांना पोसण्यासाठी तुम्ही लोकांना पाणी देत नाही, असेही अजित पवारांनी म्हटले.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे मिशन 125
पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेत भाजपने स्वबळाचा नारा दिला असून भाजपने मिशन 125 जागा जिंकण्याचं ठेवलं आहे. भाजपकडून ‘अबकी बार 125 पार‘ नारा दिला जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विरोधकांच्या फक्त तीन जागा निवडून येतील, असे भाजपकडून सांगितले आहे. त्यावरुन, राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे. भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास आणि घमेंड नडेल. याठिकाणी भाजपचे नेते 125 जागा जिंकण्याची भाषा करत आहेत. पण त्यांनी 125 जागा जिंकल्या तर मी राजकारण कायमचं सोडून देईन, असे वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल यांनी केले.


