पुणे: महाराष्ट्र आणि देशासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतिक्षित असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. हा नवीन मार्ग आता पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) वेधशाळेला वगळून जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत याबद्दल माहिती दिली.
खासदार डॉ. आमदार कोल्हे यांच्या प्रश्नाला उत्तर
शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री वैष्णव यांनी ही घोषणा केली. वैष्णव म्हणाले की, पुणे-नाशिकचा हा नवीन रेल्वे मार्ग आता पुण्याहून अहिल्यानगर आणि शिर्डीमार्गे नाशिकला पोहोचेल.
मार्ग बदलाचे कारण
मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले की, प्रकल्पाच्या जुन्या ‘डीपीआर’मध्ये असलेला मार्ग नारायणगावातून जात होता. याच ठिकाणी नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे* (NCRA) यांनी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) वेधशाळा उभारली आहे.
जीएमआरटी वेधशाळेच्या सेवेचा उपयोग 31 देशांतील वैज्ञानिक त्यांच्या महत्त्वपूर्ण वैज्ञानिक निरीक्षणांसाठी करतात. ही वेधशाळा रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अणु ऊर्जा आणि विज्ञान-तंत्रज्ञान विभागांनी रेल्वे मंत्रालयाला सल्ला दिला होता की, रेल्वे मार्गामुळे ‘जीएमआरटी’च्या कार्यामध्ये संभाव्य हस्तक्षेप होईल आणि हानिकारक परिणाम होऊ शकतो.
या गंभीर कारणांमुळेच, वेधशाळेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचा पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्यात आला आहे.
तीन जिल्ह्यांतील अंतर होणार कमी
पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांसाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, तो पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ आणि कनेक्टिव्हिटीमध्ये मोठा फरक पडेल. नवीन मार्गामुळे शिर्डीसारख्या धार्मिक स्थळांनाही रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने भाविकांसाठी ही एक मोठी सोय ठरेल.


