मुंबई: शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे परखड भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारमधील सहकाऱ्यांबाबत केले. एकीकडे आपल्या मित्रपक्षांच्या नेत्यांबाबत असे वक्तव्य करतानाच विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कामाविषयी मात्र मुख्यमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी ‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात वरील विधान केले. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या एनडीएतील घटक पक्षांच्या आणि आपल्या सरकारमधील दोन प्रमुख नेत्यांसंदर्भात असे वक्तव्य केल्याने आणि कट्टर राजकीय विरोधक असलेल्या पवारांचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केल्याने हा विषय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे. सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत गटबाजी आणि प्रमुख नेत्यांमध्ये असलेल्या संवादाची कमतरता यानिमित्ताने दिसून आली आहे. सोबतच शरद पवारांचे फडणवीसांकडून कौतुक हा महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलता प्रवाह असल्याचे मानले जाते. तसेच राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो याचीही आठवण यातून सर्वांना झाली आहे.
मुलाखतीत फडणवीस यांना आपल्या सरकारमधील दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी संवादात कोण अधिक प्रभावी आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर थेट आणि स्पष्टपणे बोलताना, ‘दोघेही संवादात चांगले नाहीत’ असे हलक्या फुलक्या शैलीत वक्तव्य केले. तसेच लगेच सावरत, मला आशा आहे, याबद्दल ते दोघेही मला माफ करतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झडू लागली. सध्या महायुतीत अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात असल्याचे मानले जाते. एकनाथ शिंदे यांच्या अमित शाहांसोबत असलेल्या जवळिकीमुळे फडणवीस-शिंदे यांच्यात संवादाचा अभाव असल्याचे मानले जाते.
अजित पवार हेसुद्धा आपले काही विषय मार्गी लावण्याकरिता प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंच्या माध्यमातून अमित शहांशी संपर्क साधतात. सध्या महायुती सरकारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील मित्रपक्षांतील नेत्यांत एकमेकांच्या विरोधात कुरबुरी व शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे दोन्हीही प्रमुख नेते संवादात चांगले नाहीत, असे परखड भाष्य केल्याचे बोलले जात आहे
यश-अपयशाची तमा न बाळगता शरद पवार सातत्याने काम करतात
शरद पवार यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. त्यांच्या काही अशाही गोष्टी आहेत ज्या मी स्वीकारत नाही, पण मी त्यांच्या सातत्यपूर्ण कामाचे कौतुक करतो. या वयातही. कोणतीही परिस्थिती असेल तरी जय-पराजयाची तमा न बाळगता ते सातत्याने काम करतात, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या सातत्य आणि समर्पणाचे कौतुक केले.


