पुणे: जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते आणि आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. धंगेकर यांनी म्हटलं आहे की, ‘जैन बोर्डिंग प्रकरणातून गोखले बिल्डर्सने मागे घेतलं असलं तरी हा गैरव्यवहार कोणाच्या आदेशाने झाला, याचा तपास झाला पाहिजे. एवढ्या मोठ्या जागेचा व्यवहार कोणी आणि कशा प्रकारे केला, हे जनतेसमोर यायला हवं.’
बिल्डर्स आणि राजकारण्यांच्या संबंधाची चौकशी व्हावी
धंगेकरांकडून धर्मादाय आयुक्तालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. अनेक प्रकरणं वर्षानुवर्षं पेंडिंग राहतात, पण यावेळी एवढा वेगवान निर्णय कसा झाला? धर्मादाय आयुक्त, बिल्डर्स आणि काही राजकारण्यांचे संबंध काय आहेत, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
धंगेकरांनी स्पष्ट केलं की, ‘मी पोलिसांत तक्रार करताना कोणाचं नाव घेणार नाही, पण जर या व्यवहारात कोण सामील आहे हे जाणून घ्यायचं असेल, तर गोखले यांनाच विचारा. धर्मादाय आयुक्त एवढ्या तत्परतेने निर्णय देतात, हे मी पहिल्यांदाचं पाहतोय.’ यानंतर धंगेकरांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही टीका केली. पुण्यात सध्या तब्बल 70 टोळ्या सक्रिय आहेत. निलेश घायवळ आणि रुपेश मारणे प्रकरणावर मी लवकरच बोलेन. पोलखोल होणारच. हा विषय शिंदे किंवा फडणवीस यांचा नाही, तर संपूर्ण प्रशासनाचा आहे, असं धंगेकर म्हणाले.
पत्रकार परिषदेदरम्यान धंगेकरांनी त्यांच्या विरोधकांनाही थेट इशारा दिला. मला राजकारणात आजवर मर्द प्रतिस्पर्धी भेटलाच नाही. माझ्या औकतीच्या पलीकडे जाऊन काही लोक बोलतात, पण योग्य वेळ आली की सगळ्यांची औकात दाखवेन. मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर जात नाही, कारण मला शिकवण चांगली आहे. सत्ता जनतेसाठी असावी, घरासाठी नव्हे, असंही ते म्हणाले. शेवटी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. दोघांनाही जनतेच्या भावना समजतात, म्हणून त्यांचा मी सन्मान करतो, असंही ते म्हणाले.


