Vijay Hazare Trophy 2025: भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आहे. बिहारचा 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या वादळी खेळीने जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने केवळ 36 चेंडूत शतक झळकावून इतिहास घडवलाच, पण 10 वर्षे जुना एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडून लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 धावा करणारा फलंदाज बनण्याचा मान पटकावला आहे.
36 चेंडूत शतक आणि 190 तुफानी धावा
विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी बिहार आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात हा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने आधी अर्धशतक आणि मग अवघ्या 36 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याचा धडाका थांबला नाही. केवळ 84 चेंडूत 15 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने त्याने 190 धावांची स्फोटक खेळी केली. तो दुहेरी शतकापासून केवळ 10 धावांनी वंचित राहिला.
हेही वाचा – IND vs SL : शफाली वर्माची तुफान खेळी! टीम इंडियाने श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवत जिंकला सामना
डिव्हिलियर्स-बटलरही वैभवच्या मागे
वैभवने आपल्या या अविस्मरणीय खेळीदरम्यान List-A क्रिकेटमधील सर्वात जलद 150 धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने केवळ 59 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी, हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा ‘मिस्टर 360’ एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता, ज्याने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 64 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडच्या जोस बटलरने 2022 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध 65 चेंडूत हाच टप्पा गाठला होता. मात्र, आता हे दोन्ही दिग्गज वैभव सूर्यवंशीच्या मागे पडले आहेत. वैभवने त्याच्या 190 धावांपैकी तब्बल 154 धावा केवळ चौकार आणि षटकारांनीच वसूल केल्या.
लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीर
वैभव सूर्यवंशीच्या नावावर हा केवळ एकच विक्रम नाही. तो List-A क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाजही ठरला आहे. आज, 24 डिसेंबर 2025 रोजी हे शतक केले, तेव्हा त्याचे वय केवळ 14 वर्षे आणि 272 दिवस इतके होते. यापूर्वी, 1986 मध्ये झहूर इलाहीने (15 वर्षे 209 दिवस) हा विक्रम केला होता, जो आता वैभवने मोडीत काढला आहे. भारतीय क्रिकेटचे भविष्य वैभव सूर्यवंशीच्या रूपाने किती उज्ज्वल आहे, हे त्याच्या या विक्रमी कामगिरीतून स्पष्ट होत आहे.


