Triple Talaq Case: ठाणे जिल्ह्यात तिहेरी तलाकचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला असून, हुंड्यात बुलेट मोटारसायकल न मिळाल्यामुळे एका नववधूला लग्नानंतर तीन दिवसातच पतीने घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुणीने भिवंडी तहसील पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे.
लग्नानंतर काही दिवसांतच छळाची सुरुवात
१९ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील मोहम्मद रशीद याच्याशी २५ वर्षीय पीडितेचे लग्न झाले. लग्नानंतर ती पतीच्या सुलतानपूर जिल्ह्यातील नान्हुई येथे राहायला गेली. तेथे गेल्यानंतर काहीच दिवसात सासरच्या मंडळींकडून तिच्यावर मानसिक आणि शारीरिक त्रास सुरू झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
हेही वाचा – नाशिकमध्ये हुंडाबळीची घटना, सासरच्यांकडून पैशांची मागणी; 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
‘बुलेट’ची मागणी न पूर्ण झाल्याने छळ वाढला
तक्रारीत पीडितेने नमूद केल्यानुसार, तिच्या कुटुंबाने सोन्याचे दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घरगुती सामान यांसह सर्व आवश्यक भेटवस्तू दिल्या होत्या. मात्र तरीही सासरच्या लोकांनी समाधान न मानता, हुंडा म्हणून बुलेट मोटारसायकल आणण्याचा दबाव टाकला. ही मागणी नाकारताच महिलेवरील अत्याचार अधिक तीव्र झाल्याचे पीडितेने सांगितले.
फक्त तीन दिवसात तिहेरी तलाक
२१ ऑक्टोबर रोजी पीडितेच्या पतीने तिला मारहाण करत तिहेरी तलाकचा उच्चार केला आणि जबरदस्तीने तिला घराबाहेर काढले. २०१९ च्या कायद्यानुसार तिहेरी तलाक बेकायदेशीर आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पती मोहम्मद रशीद, त्याचे आई-वडील आणि दोन बहिणी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 85 (क्रूरता) आणि 115 (दुखापत), तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायदा आणि मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) अधिनियम 2019 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकरणाची तपास प्रक्रिया सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणामुळे तिहेरी तलाकावर कायदेशीर बंदी असूनही अशा घटना कशा घडतात, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.


