Vijay Wadettiwar On Election Commission: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. निवडणूक आयोग ही भाजपची ‘B-Team’ बनली असून, लोकशाहीची थट्टा सुरू आहे, अशा तिखट शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. शनिवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, सध्याचा आयोग अत्यंत सुस्त आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे. बोगस मतदान आणि मतचोरी रोखण्यात आयोग अपयशी ठरला असून, केवळ निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापलीकडे त्यांना काहीही देणेघेणे उरलेले नाही.
त्र्यंबकेश्वरमध्ये ‘एक मत, ५० हजार रुपये’
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा उल्लेख करत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप एका मताला ५० हजार रुपये वाटत असल्याचा दावा त्यांनी केला. एका छोट्या नगरपरिषदेसाठी भाजप ४० कोटी रुपये खर्च करत असून, हा सर्व पैसा सरकारी तिजोरीतील लुटीचा असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबईतील १५ लाख ‘बोगस’ मतदारांचा दावा
मुंबईत तब्बल 15 लाख बोगस मतदार असल्याचा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला. एकाच मतदाराचे नाव ३-४ वेळा असूनही तक्रार करूनही आयोग कोणतीही कारवाई करत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मध्य प्रदेशातील एका जुन्या घटनेचा दाखला देत, भाजपने बंदुकीच्या जोरावर जिल्हाधिकाऱ्यांकडून निकाल फिरवून घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
धर्माबादमधील मतदारांचे ‘अपहरण’
नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजप आमदार राजेश पवार यांनी हजारो मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. पराभव समोर दिसू लागला की भाजप कुणाचा जीव घेण्यापर्यंत किंवा कुणालाही डांबून ठेवण्यापर्यंत मजल मारते, असे ते म्हणाले. एका मतदाराला ५ हजार रुपये वाटले जात असून हे ‘खोके’ कुठून आले, असा सवाल त्यांनी विचारला.
हेही वाचा – मोठी बातमी! मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार; विजय वडेट्टीवार याची घोषणा
अजित पवारांची ‘स्वबळाची’ चाल भाजपचीच रणनीती
अजित पवार यांनी महायुतीबाहेर पडून स्वतंत्र निवडणूक लढवणे ही भाजपचीच एक रणनीती असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपनेच त्यांना ही स्क्रिप्ट लिहून दिली असल्याचा दावा त्यांनी केला.


