इंदापूर: संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करून अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. 17) झालेल्या भेटीत त्यांनी यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले. या वेळी अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.
संत श्री तुकाराम महाराज पालखी (राष्ट्रीय महामार्ग 965-जी) देहू ते पंढरपूर दरम्यान भवानीनगर–इंदापूर–सराटी या सुमारे 70 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे अत्यंत संथगतीने सुरू आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे प्रवासी व नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, या कामांची चौकशी करून दर्जेदार काम करून घेण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. निमगाव केतकी व बावडा बाह्यवळण रस्ता, वकीलवस्ती येथील भुयारी मार्ग, वडापुरी येथील उड्डाणपूल, तरंगवाडी, लासुर्णे तसेच भवानीनगर–सणसर परिसरातील रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असून ती तातडीने पूर्ण करावीत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हेही वाचा – Indapur Depot: संत बाळुमामा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा; इंदापूर-आदमापूर थेट बससेवा सुरू
इस्टिमेटनुसार वृक्षारोपण, रस्ता दुभाजक, स्ट्रीट लाईट, दिशादर्शक फलक तसेच गटारींची कामे अनेक ठिकाणी झाली नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चालू वर्षी जुलै महिन्यात पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सुरवड येथे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पालखी रथ जाणाऱ्या गावागावातील सेवा रस्ते रुंद व दर्जेदार करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा – Indapur: इंदापूरच्या चेतना फार्मसी कॉलेजची आरती कारंडे ठरली दुहेरी शैक्षणिक शिष्यवृत्तीची मानकरी
कामे अपूर्ण असतानाही पालखी मार्गावर टोल वसुली सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करत, करारानुसार सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच टोल वसुली सुरू करावी, तोपर्यंत टोल आकारू नये, अशी ठाम भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी मांडली. अपूर्ण कामांमुळे अनेक अपघात झाले असून त्यात काहींना जीव गमवावा लागल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी पालखी सोहळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण व्हावीत, यासाठी तातडीने बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, पालखी मार्गावरील निकृष्ट कामांची चौकशी करून अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत तसेच निवेदनातील इतर मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले जातील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.


