Gopichand Padalkar: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आणि अंगावर शहारे आणणारे आरोप केले आहेत. “आपले राजकीय करिअर उजळण्यासाठी जयंत पाटील यांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडून रक्ताने आंघोळ घातली होती,” असा खळबळजनक दावा पडळकरांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पडळकरांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रक्ताचा अभिषेक आणि नरबळीचा संशय
पडळकर यांनी जयंत पाटलांच्या ‘पुरोगामी’ प्रतिमेवर जोरदार प्रहार केला. त्यांनी दावा केला की, सांगलीतील इस्लामपूर येथे भोंदूबाबा अशोक खरात याने जयंत पाटील यांना रक्ताने आंघोळ घातली होती. “हे रक्त नेमके कोणाचे होते? खरातवर नरबळीचा संशय असल्याने या रक्ताच्या स्त्रोताची तातडीने चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी पडळकरांनी केली आहे. इतकेच नव्हे तर, राजकीय शक्ती मिळवण्यासाठी जर पाटलांनी खरातची पूजा केली असेल, तर कदाचित त्यांनी त्याचे मूत्रही प्राशन केले असावे, अशी अत्यंत अमानवीय आणि बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
पुरोगामीत्वाचा बुरखा फाडल्याचा दावा
“एकीकडे फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे अशा विकृत भोंदूबाबांना घरी बोलावून तांत्रिक विधी करायचे, हे निव्वळ ढोंग आहे,” अशा शब्दांत पडळकरांनी राष्ट्रवादीच्या विचारधारेवर निशाणा साधला. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे जयंत पाटील आपल्या मुलाला घेऊन ईशान्येश्वर मंदिरात या भोंदूबाबाच्या चरणी का गेले होते? असा सवाल करत पडळकरांनी त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेवर आणि तांत्रिक विधींवरील ओढ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शासकीय मेहेरबानी आणि भ्रष्टाचाराचे आरोप
केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना त्यांनी अशोक खरातसाठी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोपही पडळकरांनी केला आहे. खरातसाठी ४० किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन का टाकण्यात आली आणि यामध्ये पाटलांचे नेमके हितसंबंध काय होते, याचा खुलासा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो सार्वजनिक कार्यक्रमातील आहेत, मात्र जयंत पाटलांचे संबंध हे वैयक्तिक आणि संशयास्पद विधींसाठी असल्याचे पडळकरांचे म्हणणे आहे.
राजकीय अधोगतीचा टोला
जयंत पाटलांच्या राजकीय भविष्यावर भाष्य करताना पडळकर म्हणाले की, “कधीकाळी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे जयंत पाटील आता जिल्हा परिषद सदस्यांना धरून बसले आहेत. त्यांची ही राजकीय घसरण लवकरच त्यांना ग्रामपंचायतीपर्यंत घेऊन जाईल.” पाचोरा ते ग्रामपंचायत असा त्यांचा प्रवास सुरू झाला असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. या गंभीर आरोपांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


