Sunetra Pawar Meet PM Modi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पहिल्याच दिल्ली दौऱ्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपसदृश हालचालींचे संकेत दिले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची आणि सत्तेची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत केवळ सांत्वनच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत अत्यंत ‘गोपनीय’ चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले असून, यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दिल्लीत ४० मिनिटांची खलबतं; राष्ट्रवादीच्या भविष्याचा ‘मास्टर प्लॅन’?
मंगळवारी रात्री दिल्लीत पोहोचलेल्या सुनेत्रा पवार यांनी बुधवारी सकाळपासूनच महत्त्वाच्या बैठकांचा धडाका लावला. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पुत्रांसह त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या 40 मिनिटांच्या बैठकीत अजितदादांच्या पश्चात महायुतीची ताकद कशी टिकवता येईल, यावर सविस्तर मंथन झाले. या हालचालींमुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस नव्या स्वरूपात दिसण्याची शक्यता आहे.
मंत्रालयातील ‘अजित’ स्मृतींना वंदन
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुंबईत सुनेत्रा पवारांनी पदाचा कार्यभार स्वीकारताना उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात प्रवेश करताना वातावरण भावूक झाले होते. आपल्या पतीच्या म्हणजेच अजितदादांच्या रिक्त खुर्चीला वाकून नमस्कार करताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना हुंदका आवरता आला नाही. “दादांची विकासकामे पुढे नेणे हीच माझी आता खरी जबाबदारी आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासाची अत्यंत भावनिक सुरुवात केली.
नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. @narendramodi pic.twitter.com/K41zf6wNXR
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 11, 2026
मोठ्या बदलांचे संकेत
सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीवारी केली आणि त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार पंतप्रधानांच्या भेटीला गेल्या. या दोन्ही दौऱ्यांचा परस्पर संबंध असून महायुतीचा आगामी ‘नवा आराखडा’ दिल्लीत तयार झाल्याचे बोलले जात आहे. अजितदादांच्या जाण्याने रिक्त झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काही मोठे फेरबदल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या दिल्ली दौऱ्याचे परिणाम लवकरच महाराष्ट्राच्या सत्ताकारणात दिसून येतील.


