AC Explosion: वाडा तालुक्यातील अबिटघर (अभाणपाडा) येथील ‘विस्तार मेटल’ कंपनीत शुक्रवारी रात्री एका भीषण अपघाताने खळबळ उडाली. कंपनीतील वातानुकूलन यंत्रणेची (AC) दुरुस्ती करत असताना झालेल्या प्रचंड स्फोटात तीन अनुभवी कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दुरुस्ती दरम्यान घडली दुर्दैवी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठ वर्षांपासून बंद असलेली ही कंपनी जानेवारी महिन्यापासून पुन्हा सुरू करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास कंपनीतील एसी युनिटमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. याचवेळी अचानक यंत्रणेचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यात काम करणाऱ्या तीनही कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील मृत व्यक्ती:
- मोहम्मद अली अन्सारी (वय ३२, रा. कुर्ला)
- अखिलेश कुमार मोतीलाल जैस्वाल (वय ४५, मूळ रा. उत्तर प्रदेश)
- किसन भिवा निकम (वय ५५, रा. शीव)
व्यवस्थापनाचा ‘हात झटकण्याचा’ प्रकार
या भीषण दुर्घटनेनंतर कंपनीचे व्यवस्थापक दिनेश मित्तल यांनी आपली बाजू मांडताना जबाबदारी घेण्यास नकार दिला. “आम्ही दुरुस्तीचे काम कंत्राटावर दिले होते, त्यामुळे यात कंपनीचा दोष नाही. कामगार सुरक्षा साधने वापरत नाहीत,” असे विधान मित्तल यांनी केल्याने कामगार वर्गात संताप व्यक्त होत आहे.
वाडा पोलिसांकडून चौकशी सुरू
वाडा पोलिसांनी या प्रकरणी सध्या ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे. कारखाना निरीक्षकांचा (Factory Inspector) तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर, सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वाडा औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांमध्ये सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण आणि कामगारांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेचा अभाव असल्याने, हे कारखाने ‘मृत्यूचे सापळे’ बनत चालले आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


