Devendra Fadnavis: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेले संशय आणि ‘घातपाता’चे दावे यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी, तपास यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप किंवा तर्क-वितर्क करणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
तपासाची व्याप्ती आणि केंद्राचा सहभाग
रोहित पवारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, अजितदादा हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ आणि लाडके नेते होते, त्यामुळे त्यांच्या अपघाताची सखोल चौकशी होणे ही जनभावना रास्तच आहे. “या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, ही पहिली मागणी मीच केली होती. माझ्या विनंतीवरून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने तातडीने विशेष चौकशी समिती गठीत केली असून सध्या त्याचे काम वेगाने सुरू आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
‘ब्लॅकबॉक्स’ आणि तांत्रिक पुरावे ताब्यात
तपासाच्या प्रगतीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, तज्ज्ञांच्या हाती आता महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. “विमानाचा ब्लॅकबॉक्स, काही महत्त्वाचे सुटे भाग आणि पायलट व एटीसी (ATC) मधील संभाषणाचे रेकॉर्डिंग तपास यंत्रणांकडे उपलब्ध आहे. डीजीसीए (DGCA) आणि सीआयडी (CID) या दोन्ही यंत्रणा समांतर तपास करत आहेत. अशा परिस्थितीत तपास पूर्ण होण्याआधीच कोणतेही तर्क लढवणे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारे ठरेल,” असे त्यांनी बजावले.
भारतीय तपास यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न नको
रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या संशयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “रोहित पवार कदाचित भावनेच्या भरात बोलले असतील, मात्र भारतीय तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. अनेक देश आपल्या तज्ज्ञांची मदत घेतात. अशा वेळी आपल्याच यंत्रणांवर अविश्वास दाखवणे चुकीचे आहे. जर रोहित पवारांकडे काही ठोस मुद्दे किंवा पुरावे असतील, तर त्यांनी ते थेट तपास अधिकाऱ्यांकडे सोपवावेत, जेणेकरून त्यांच्या शंकांचे निरसन होईल.”
अजितदादांच्या स्मृतीचा आदर राखण्याचे आवाहन
शेवटी, या प्रकरणाचे राजकीय भांडवल करू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. “आपल्या सर्वांनाच या अपघाताचे सत्य जाणून घ्यायचे आहे. ते सत्य लवकरच बाहेर येईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. मात्र, अजितदादांच्या दुर्दैवी निधनाचा वापर राजकीय हेतूसाठी केला जाऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


