मुंबई: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असे एनआयएच्या विशेष न्यायालयाने म्हटले आहे. 1000 पानांहून अधिक पानांचे निकालपत्र असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयाने आज (31 जुलै) निकाल दिला आहे.
भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचा मृत्यू, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. निर्दोष सुटका होताच आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले आणि आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, असं म्हणत आरोपी भावूक झाले.
न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, बॉम्ब ब्लास्ट झाल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केले. पण ब्लास्ट हा स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. तसेच तपासात अनेक त्रुटी होत्या. या सर्व त्रुटीचे वाचन देखील निकाल देताना करण्यात आले. याबरोबरच पंचनामा योग्य नव्हता. हातांचे ठसे जागेवरून जप्त करण्यात आले नाही, असे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवले.
दुचाकीचा चेसीस नंबर देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही. दुचाकीची मालक साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर होती हे देखील स्पष्ट नाही, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेच्या दाव्यांवर न्यायालयाचे समाधान झाले नाही. सुरुवातीला लावलेला मोक्का नंतर मागे घेतल्याने याअंतर्गत सर्व जबाब निरर्थक ठरत असल्याचे न्यायालयाने म्हटले. युएपीएसाठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे. त्यामुळे युएपीएलागू होत नाही. तसेच कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवरदेखील न्यायालयाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. कर्नल प्रसाद पुरोहितांनी आरडीएक्स आणले याचा पुरावा नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. सर्व आरोपींना संशयाचा फायदा म्हणजेच बेनिफिट ऑफ डाऊट आहे. फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असे कोर्टाने म्हटले आहे.


