मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एपस्टाईन फाइल्सच्या वादग्रस्त खुलाशांमुळे वातावरण ढवळून निघालं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या “एक महिन्यात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल” या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य अमेरिकेतील जेफरी एपस्टाईन फाइल्सच्या संदर्भात आलं असून, त्यातून भारतीय राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळजनक दावा केला की, महायुती सरकारच्या द्विवर्षपूर्तीपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्रीपदावर येणार. मिटकरी यांच्या या विधानाने महायुतीत खळबळ उडाली आहे.
पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य काय?
चव्हाण यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, “अमेरिकेत सध्या एपस्टाईन फाइल्समुळे गदारोळ माजला आहे. ही फाइल उघड झाल्यावर भारताच्या राजकारणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल.” जेफरी एपस्टाईन हा अमेरिकेतील मोठा उद्योगपती होता, ज्याने बेकायदेशीर कारवाया केल्या. त्याच्या फाइल्समध्ये विविध राजकीय नेत्यांची नावं आहेत, ज्यात राष्ट्रपती ट्रम्प यांचंही आहे.
चव्हाण यांनी सांगितलं की, सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत व्हिडीओ केला असून, अमेरिकी संसद ही फाइल्स उघडण्यासाठी दबाव आणत आहे. १० हजार कागदपत्रं ताब्यात घेतली गेली असून, ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. “मी फक्त म्हटलं की, मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, त्यातून काय अर्थ काढायचा तो काढा,” असं चव्हाण म्हणाले. या वक्तव्याने सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क सुरू झाले असून, काहींनी यातून देवेंद्र फडणवीस किंवा इतर मराठी नेत्यांचा उल्लेख असल्याचा अर्थ काढला आहे.
अजितदादा लवकरच CM, द्विवर्षपूर्तीपर्यंतच; अमोल मिटकरींचा दावा
मिटकरी यांनी चव्हाणांच्या वक्तव्याला जोडून महाराष्ट्रातील राजकीय बदलांची शक्यता व्यक्त केली. “देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस बसू शकतो, हे चव्हाणांचं वक्तव्य सहजपणे केलेलं नव्हतं. ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त काहीतरी वेगळं होऊ शकतं का, हे चव्हाणांना विचारलं पाहिजे. त्याच अनुषंगाने मी म्हणतो की, महाराष्ट्रात लवकरच ‘अजितपर्व’ येईल,” असं मिटकरी म्हणाले. अजित पवार हे उर्जावान नेते असून, लाडकी बहीण योजनेची संकल्पना आणि अंमलबजावणी त्यांचीच आहे, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला, असंही त्यांनी सांगितलं.
मिटकरी यांनी अजित पवारांच्या संयमाची प्रशंसा केली. “अजितदादा कधी रुसवाफुगवा करत नाहीत. विरोधकांकडून आरोप होतात, तरी ते शांतपणे काम करतात. गेल्या वर्षभरात महायुतीत घट्टपणे राहिले. पार्थ पवार प्रकरणातही संयम ठेवला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. आम्ही दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहोत, हे मान्य करतो. कार्तिकी एकादशीला एकनाथ शिंदे यांना पूजेचा मान दिला,” असं मिटकरी म्हणाले. मिटकरी यांनी पूर्वीही (२०२३ मध्ये) ट्विट करून “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो…” असं लिहून अजित पवारांच्या CM होण्याची शक्यता व्यक्त केली होती.


