मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला आता नवं वळण मिळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आंदोलकांसाठी आझाद मैदानाऐवजी ब्रेबॉर्न स्टेडियम (CCI क्लब) येथे आंदोलनासाठी जागा देण्याची सूचना केली आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखल झाल्याने आंदोलकांना बसण्यास आणि राहण्यास अडचणी येत आहेत. यामुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ आंदोलकांवर आली आहे, ज्यामुळे वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. राऊत यांच्या या सूचनेमुळे आंदोलनाला नवं मैदान मिळण्याची शक्यता आहे, पण त्याचवेळी त्यांनी सरकारवर आणि मंत्रिमंडळातील मराठा मंत्र्यांवर तीव्र टीका केली आहे.
ब्रेबॉर्न स्टेडियम का?
संजय राऊत यांनी म्हटलं, “आझाद मैदानात पावसामुळे चिखल होतो, कार्यकर्त्यांना बसता येत नाही, त्यामुळे ते रस्त्यावर येतात. यापेक्षा ब्रेबॉर्न स्टेडियम (CCI क्लब) मराठा आंदोलकांना आंदोलनासाठी द्यावं. तिथे सध्या क्रिकेट सामने होत नाहीत, फक्त श्रीमंतांचा क्लब आहे आणि दारू पिण्याशिवाय तिथे काही होत नाही. वसंतराव नाईक यांच्या काळातही मराठा समाजाच्या दुष्काळाच्या कार्यक्रमाला तिथे जागा नाकारली गेली होती. आता तिथे आंदोलकांना जागा द्यायला हवी.”
राऊत यांनी ही सूचना शिवसेना नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून आल्याचं सांगितलं. त्यांनी वानखेडे स्टेडियमचा पर्याय नाकारला, कारण तिथे क्रिकेट सामने आणि इतर कार्यक्रम नियमित होतात, तसेच सचिन तेंडुलकर, शरद पवार, सुनील गावस्कर यांचे पुतळे आणि म्युझियम आहे. राऊत यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमला “निष्क्रिय” मैदान म्हटलं, जिथे आंदोलकांना योग्य सुविधा मिळू शकतील.
राऊत यांनी सरकारवर आणि मराठा मंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “जर आंदोलकांना जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न झाला, तर मंत्रिमंडळातील स्वत:ला मराठा समजणाऱ्या मंत्र्यांना जाब विचारावा लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या चेहऱ्यावर उपसमितीच्या बैठकीत कसलीही गंभीरता नव्हती. ते हसत-खिदळत काजू-बदाम खात होते, तर बाहेर लोक उपाशी आहेत.” राऊत यांनी पुढे आरोप केला की, मंत्रिमंडळातील काही मराठा नेते आंदोलनाच्या आडून राजकीय पोळ्या भाजत आहेत.
त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला, असा दावा करत की, “देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडून स्वत:च्या घरात आग लावली, आणि हे अमित शाह यांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. दिल्लीतील भाजपचा एक गट फडणवीसांच्या विरोधात राजकारण करत आहे.”


