पुणे : मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर काहींनी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला. या उलथापालथीमुळे मावळ मतदारसंघातील राजकारण अधिक रंगतदार झाले आहे.
विशेषतः बापूसाहेब भेगडे गटातील शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये सामील होण्याचा प्रकार चर्चेत आहे, यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे पक्षातील नाराज नेत्यांना परतवण्यात यश मिळाले असल्याचे दिसून येत आहे.
भाजपमध्ये राष्ट्रवादी नेत्यांचा प्रवेश
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार सुनील शेळके यांना पक्षाने संधी दिली, यामुळे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे नाराज झाले. भेगडे यांच्या पाठीशी अपक्ष उमेदवार म्हणून भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रवादीच्या नाराज गटाने उभे राहिले, तरी शेळके यांनी एक लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. या निकालानंतर भेगडे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले.
15 सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या एका मोठ्या सोहळ्यात मावळातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा समावेश आहे. रामदास काकडे, बाबुराव वायकर, सुभाष जाधव, किशोर भेगडे, सचिन घोटकुले, आतिष परदेशी, संग्राम काकडे, शिवाजी आसवले, संतोष मुऱ्हे, प्रवीण काळोखे, तुषार भेगडे, अरूण माने, अरूण चव्हाण आणि तनुजा जगनाडे यांसारखे प्रमुख नेते-कार्यकर्ते सामील झाले. या सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदीप कंद, रवींद्र भेगडे, गणेश भेगडे आणि भाऊ गुंड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील एकूण 34 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, यामध्ये मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी-विक्री संघाचे संचालक, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि उपनगराध्यक्षांचा समावेश आहे. हे प्रवेश भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असल्याचे सांगितले जाते, ज्यामुळे अजित पवारांच्या गडाला धक्का बसला आहे. नव्याने सामील झालेल्या नेत्यांनी भाजपाच्या वाढीसाठी मावळात प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला.
अजित पवारांचा हस्तक्षेप, नाराज नेत्यांना परतवण्यात यश
निवडणुकीनंतर भेगडे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी स्वतः बापूसाहेब भेगडे यांनी तब्येतीचे कारण देत प्रवेश टाळला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेत नाराज नेत्यांशी फोनवर संवाद साधला. “आपण एकत्रित राहून पुन्हा मावळात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करू,” असे आवाहन करून त्यांनी पक्षातील एकजूट राखण्याचा प्रयत्न केला. यामुळे भेगडे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला.


