Pune School Controversy: पुण्यातील प्रतिष्ठित कल्याणी शाळेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा प्रशासनाने पालकांची पूर्वसंमती न घेता विद्यार्थ्यांचे केस कापण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी २:१५ या वेळेत इयत्ता ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून शाळेच्या आवारात आणण्यात आले. तिथे बोलावलेल्या न्हाव्यांनी विद्यार्थ्यांचे केस कापले. पालकांनी आरोप केला की, एकाच रेझर आणि कंगव्याचा वापर करून स्वच्छतेचे नियम पाळले गेले नाहीत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला. शिवाय, प्रत्येक केसकापणीचा खर्च ३०० रुपये विद्यार्थ्यांच्या डिपॉझिटमधून वजा करण्यात आले.
या घटनेच्या आधी ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११:२५ वाजता पालकांना ईमेल पाठवण्यात आला होता. त्यात शाळेने म्हटले होते की, ‘वैयक्तिक सौंदर्य आणि शिस्त ही शाळेच्या मूल्यांचा भाग आहे. नियम न पाळल्यास केस कापले जातील. पालकांनी यावर आक्षेप घेत, रात्री उशिरा मेल पाठवून कोणतीही प्रतिक्रिया देण्याची संधीच दिली नाही, असे सांगितले. एका पालकाने संतप्तपणे विचारले, आमच्या मुलांच्या शरीराबद्दलचे निर्णय शाळा आमच्या संमतीशिवाय कसे घेऊ शकते?
पालक आणि कार्यकर्त्यांचा संताप
दुसऱ्या दिवशी शाळेत आलेल्या पालकांना प्रशासनाने भेटण्यास नकार दिला आणि ही बाब “अंतर्गत धोरणात्मक” असल्याचे सांगितले. पण ही गोष्ट सोशल मीडियावर पसरताच संतापाची लाट उसळली. बालहक्क कार्यकर्त्यांनी शाळेच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, विद्यार्थ्यांच्या संमती, सन्मान आणि स्वच्छतेच्या अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे म्हटले.
हेही वाचा – पुणे पोलिसांच्या टार्गेटवर मारणे गँग; टोळीचा शार्प शूटर बनसोडेला घेतलं ताब्यात
शिक्षणतज्ज्ञांचा इशारा
शिक्षण तज्ञांनी या कृतीचा निषेध करत स्पष्ट केले की, शिस्त आणि नीतीमत्ता जपताना शाळेने विद्यार्थ्यांच्या संमतीचा आणि सन्मानाचा भंग करू नये. कोणतेही नियम पारदर्शक, लिंगनिरपेक्ष आणि पालकांच्या माहितीत असले पाहिजेत. या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (MSCPCR) ने चौकशी सुरू केली आहे. अनेक पालक गटांनी औपचारिक तक्रारी दाखल केल्या असून, शाळा प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागवले जाण्याची शक्यता आहे.


