भारतीय महिला संघाने रविवारी दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकला. देशात मोठा जल्लोष झाला. आज बुधवारी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजेत्या टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी पीएम मोदी यांनी संघातील महिला खेळाडूंचे कौतुक केले. ‘सुरुवातीच्या पराभवानंतर आणि सोशल मीडियावर टीका होऊनही, संघाने उल्लेखनीय कामगिरी करून विजेतेपद जिंकले. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
यावेळी हरमनप्रीत कौर म्हणाली की, २०१७ मध्येही पंतप्रधान यांची भेट दिली होती, पण त्यावेळी संघ ट्रॉफीशिवाय गेला होता. यावेळी कौर हसत हसत म्हणाली की, “आता आम्ही ट्रॉफी घेऊन परतलो आहोत आणि अशा प्रसंगी आम्हाला पंतप्रधानांना भेटत राहायचे आहे.”
“पंतप्रधान नेहमीच संघाला प्रेरणा देतात आणि त्यांची ऊर्जा प्रत्येक खेळाडूला नवीन दिशा देते. आज देशातील मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत आणि पंतप्रधानांच्या प्रोत्साहनाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे उपकर्णधार स्मृती मानधना म्हणाली.
विजयानंतर पंतप्रधान मोदींनी संघाचे अभिनंदन केले
महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केली. “भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अंतिम फेरीत शानदार विजय मिळवला आहे. खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास आणि टीमवर्क दाखवले. हा ऐतिहासिक विजय भविष्यातील विजेत्यांना हा खेळ स्वीकारण्यास आणि देशाला गौरव मिळवून देण्यासाठी प्रेरणा देईल. टीम इंडियाचे खूप खूप अभिनंदन“, असे पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये लिहिले.


