नवी दिल्ली: पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात पाच भारतीय नागरिकांच्या अपहरणाची पुष्टी झाल्यानंतर, भारत सरकार आणि भारतीय दूतावासाने त्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA)याविषयी,”बामाको येथील भारतीय दूतावास मालियन अधिकाऱ्यांशी आणि संबंधित कंपनीशी सतत संपर्कात आहे” असे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, “ही घटना 6 नोव्हेंबर 2025 रोजी घडली, ज्याठिकाणी अलिकडच्या काळात सशस्त्र गटांनी असंख्य हल्ले आणि अपहरण केले आहेत.
भारतीय दूतावासाचे निवेदन
माली येथील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट केले की, “आम्हाला 6 नोव्हेंबर रोजी आमच्या पाच नागरिकांच्या अपहरणाच्या दुःखद घटनेची माहिती आहे. त्यांची सुरक्षित आणि लवकर सुटका सुनिश्चित करण्यासाठी दूतावास मालियन अधिकाऱ्यांशी आणि संबंधित कंपनीसोबत काम करत आहे.” पोस्टमध्ये MEAIndia आणि PMOIndia ला देखील टॅग केले आहे, जे सूचित करते की सरकार या प्रकरणावर उच्च पातळीवर लक्ष ठेवत आहे.
सतत संपर्क आणि प्रयत्न
नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय दूतावास मालियन सुरक्षा संस्था आणि हे भारतीय जिथे काम करत होते त्या कंपनीशी सतत संपर्कात आहे. या प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती समजून घेण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्यालय इतर परदेशी मिशन आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांशी समन्वय साधत आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की “त्यांच्या सुटकेसाठी सर्व आवश्यक प्रयत्न केले जात आहेत आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.”
मालीमध्ये अस्थिरता माली हा पश्चिम आफ्रिकेतील सर्वात अस्थिर देशांपैकी एक आहे. अनेक लष्करी उठाव आणि अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित जिहादी गटांच्या वाढत्या कारवायांमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मध्य आणि उत्तर मालीमध्ये परदेशी कामगारांचे अपहरण विशेषतः सामान्य आहे. कारण या भागात सरकारी नियंत्रण कमकुवत आहे.


