Chhatisgarh Naxals Encounter: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. जिल्हा रिझर्व्ह गार्ड (DRG) च्या जवानांनी केलेल्या कारवाईत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. विशेष म्हणजे, या चकमकीत तत्कालीन एएसपी आकाश राव गिरपुंजे यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या नक्षलवाद्याचाही खात्मा करण्यात आल्याने सुरक्षा दलांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
12 नक्षलवादी ठार
मिळालेल्या माहितीनुसार, सुकमाच्या किस्ताराम भागात सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू होती. यादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर दबा धरून गोळीबार केला. सुमारे 1 तास चाललेल्या या तीव्र चकमकीत जवानांनी चोख प्रत्युत्तर देत 12 नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकीनंतर घटनास्थळावरून जवानांनी AK-47 आणि इन्सास (INSAS) रायफल्ससह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत कोंटा एरिया कमिटीमध्ये सक्रिय असलेला कुख्यात माओवादी ‘मंगडू’ (वेट्टी मुका) याचाही खात्मा करण्यात आला आहे. मंगडू हा गोगुडा गावचा रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून माओवादी संघटनेत सक्रिय होता. प्रशासनाने त्याच्यावर 8,00,000 रुपयांचे बक्षीस ठेवले होते. एसपी किरण चव्हाण यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीआरजीची टीम या मोहिमेसाठी पाठवली होती.
हेही वाचा – सुरक्षा दलाला मोठं यश! माडवी हिडमाला ठार केल्यानंतर आणखी एका चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे एसीएम हितेश याचा खात्मा. हितेश हा 9 जून रोजी कोंटाजवळ झालेल्या आयईडी स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता, ज्यामध्ये एएसपी आकाश राव गिरपुंजे शहीद झाले होते. हितेशला ठार करून जवानांनी एएसपी गिरपुंजे यांच्या हौतात्म्याचा बदला घेतला आहे. सुकमा सोबतच विजापूर जिल्ह्यातही सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. तेथील शोध मोहिमेदरम्यान सैनिकांनी 2 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सुकमाच्या जंगलात अजूनही शोध मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


