केरळ: केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबामुळे पसरणाऱ्या अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस या प्राणघातक आजाराने भीतीचं सावट निर्माण केलं आहे. गेल्या नऊ महिन्यांत या आजाराने राज्यात 17 जणांचा बळी घेतला असून त्यापैकी 7 मृत्यू या महिन्यातच झाले आहेत. या आजाराचा संसर्ग नेमका कसा होतो याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सुरुवातीला असा समज होता की तलाव, नद्या किंवा स्विमिंग पूलमध्ये पोहणाऱ्या लोकांना हा आजार होतो, पण नवजात बाळासह घरच्या घरी आंघोळ करणाऱ्या लोकांनाही संसर्ग झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे तज्ज्ञ चिंतेत आहेत.
आरोग्य विभागाच्या मते, केरळमध्ये मृत्युदर सुमारे 24 टक्के आहे, तर जागतिक पातळीवर तो तब्बल 97 टक्के आहे. तरीसुद्धा संसर्ग टाळण्यासाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. खबरदारी म्हणून पोहताना किंवा आंघोळ करताना नाकात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांचे आवाहन आहे.
दरम्यान, 27 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाने सूचना जारी करत साचलेल्या तलाव, नद्या आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्यास सक्त मनाई केली आहे. आतापर्यंत केरळमध्ये या संसर्गाचे 66 रुग्ण आढळले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे.


