Ajit Pawar Plane crash investigation : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण देश हादरला असतानाच, आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी केंद्राने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राची दखल घेत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या भीषण दुर्घटनेचा तपास ‘विमान अपघात तपास ब्युरो’ (AAIB) कडे सोपवला आहे. केंद्रीय मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी या तपासातून सत्य लवकरच बाहेर येईल, अशी ग्वाही दिली आहे.
तपास यंत्रणेने घटनास्थळावरून विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ (FDR & CVR) शोधून काढला आहे. हा तांत्रिक डबा अपघाताचे गूढ उकलण्यासाठी सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. अपघाताच्या शेवटच्या क्षणी वैमानिक आणि सह-वैमानिकांमध्ये काय संवाद झाला? काही तांत्रिक अडचण जाणवली होती का? याचे रेकॉर्डिंग यात असेल. विमानाची गती, इंजिनची स्थिती आणि उंची या बाबींचे विश्लेषण केले जाईल. विमानाचे इंधन दर्जेदार होते का आणि देखभालीमध्ये काही त्रुटी होत्या का, याचीही कसून तपासणी केली जात आहे.
VVIP प्रवासासाठी नवी नियमावली येणार?
अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याचा असा अपघाती अंत होणे, ही देशाच्या सुरक्षा यंत्रणेसमोरील चिंतेची बाब आहे. या चौकशीनंतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) विमान प्रवासासाठी केंद्र सरकार अधिक कडक आणि नवी नियमावली लागू करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्र आज बारामतीत एकवटला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘दादां’ना अखेरची मानवंदना देण्यात आली. पार्थ आणि जय पवार या दोन्ही पुत्रांनी आपल्या पित्याला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांनी दिलेल्या ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी बारामतीचा परिसर दुमदुमून गेला होता.


