Shirdi Prasadalay Controversy: शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करून भाजपचे माजी खासदार सुजय विखे पुन्हा चर्चेत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना, संस्थानतर्फे दिला जाणारा प्रसाद “मुळात जेवण असून त्याला प्रसाद म्हणणे चुकीचे आहे,” असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे. पोळी, भात, वरण आणि मिठाई असलेले भोजन प्रसादाच्या स्वरूपात देण्याची ही पद्धत अयोग्य असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुजय विखे यांनी यापूर्वीही शिर्डीत मद्यधुंद अवस्थेत स्वतःला साईभक्त म्हणवत फिरणाऱ्यांवर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर मोठी टीका होत असतानाच आता त्यांच्या नव्या विधानाने पुन्हा वादाला तोड फुटलं आहे.
सुजय विखे नेमकं काय म्हणाले?
महापालिकेच्या प्रचार सभेत बोलताना सुजय विखे म्हणाले, “प्रसाद म्हणजे लापशी आणि घुगऱ्या, तेच परंपरेने मान्य आहे. पण इथे पोळी, भात, वरण, मिठाई दिली जाते. हा प्रसाद कसा झाला? हे स्पष्टपणे जेवणच आहे. माझा हॉटेल व्यवसाय चालावा म्हणून मी याला विरोध करत नाही, पण प्रसादाच्या नावाखाली जे चाललंय ते चुकीचं आहे.” यापुढे ते म्हणाले, “रात्री दारू पिऊन ‘साईभक्त’ म्हणून जे येतात ते भक्त नाहीत. तेच भिकारी, गुन्हेगार इथे आश्रय घेत होते. जेवायचं, झोपायचं आणि सकाळी उठून पळायचं, अशी त्यांची सवय झाली आहे. हे थांबलेच पाहिजे. जेव्हा शिर्डीत दुहेरी हत्याकांड घडले, तेव्हा लोकांनीच मान्य केलं की मी जे बोलत होतो ते खरं होतं.”
हेही वाचा –संगमनेरमध्ये नवं समीकरण! थोरात-विखे संघर्ष पुन्हा पेटला; मैथिली तांबे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात?
याआधीही वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत
साई संस्थानच्या मोफत जेवण योजनेला विरोध करताना सुजय विखे यांनी यापूर्वी “राज्यातील भिकारी मोफत जेवण्यासाठी शिर्डीत जमा झाले आहेत” असे विधान केले होते. या वक्तव्यावर त्या वेळी विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता नव्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.


