पालघर: डहाणू नगर परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ही योजना म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे.
डहाणू नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रितपणे शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी भरत सिंह राजपूत यांना पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाने राजेंद्रमाछी यांना उमेदवारी दिली असून, या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संजय पाटील आणि हाफिजूर रहमान खान यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने या लढतीला आणखी स्पष्टता आली. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिंदे गट एकीकडे, तर महाविकास आघाडी दुसरीकडे अशा सरळ-साध्या लढतीचे चित्र उभे राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत डहाणूतील अनेक प्रभागांमध्ये थेट एक एक उमेदवारांमधील लढतीची स्थिती निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 2, 3, 5, 7, 11 आणि 12 या प्रभागांमध्ये उमेदवारांची संख्या फक्त दोन इतकीच असल्याने मतदारांकडून कोणत्या बाजूला कल झुकतो यावरच निकाल अवलंबून असेल. इतर प्रभागांमध्येही तीन ते चारपेक्षा जास्त उमेदवार मैदानात नसल्याने संपूर्ण निवडणूक सरळ, स्पष्ट लढतीची बनली आहे. स्थानिक राजकारणात ही स्थिती विशेष मानली जात असून यामुळे प्रभागनिहाय प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत बोलताना महाविकास आघाडीवरही टीका केली. जनतेच्या हिताच्या योजना थांबवणे, अडथळे निर्माण करणे आणि विकासाला ब्रेक लावणे ही त्यांची पद्धत आहे. आम्ही केला तो विकास आणि त्यांनी केलेली राजकारणाची नकारात्मक शैली, यातला फरक डहाणूची जनता ओळखते, असे ते म्हणाले. त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा विशेष उल्लेख करत ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वाची असून ती दडपण्याचा प्रयत्नही काही राजकीय शक्ती करणार नाहीत, असा विश्वासही व्यक्त केला.
डहाणूची निवडणूकही आता प्रतिष्ठेची बनली
डहाणू नगर परिषद निवडणूक स्थानिक विकासाच्या तक्रारी, सत्तांतराचे राजकारण, नवीन प्रभाग रचना आणि दोनगटांमधील चुरशीची लढत यामुळे विशेष महत्त्वाची ठरत आहे. दोन्ही बाजू आपापल्या मतदारांना आवाहन करत असून, आगामी काही दिवसांत प्रचाराला अधिक वेग येणार आहे. राज्यातील इतर नगरपरिषदांसारखीच डहाणूची निवडणूकही आता प्रतिष्ठेची बनली असून कुणाचा विजय होणार, कोणाचा पराभव होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालानंतर स्थानिक राजकारणात मोठे बदल दिसण्याची शक्यता असून, ही निवडणूक येथील राजकीय भावी चित्र ठरवणारी ठरेल, असे निरीक्षकांचे मत आहे.


