Pune Land Scam: पुण्यातील जमीन व्यवहारांवरून पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण झाले आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या 40 हेक्टर जमिनीबाबत सह-जिल्हा निबंधक यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या सुमारे 5 एकर जमिनीतील अनियमिततेचं प्रकरण समोर आलं आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अमेडिया कंपनी आणि त्यातील भागीदारांची नावं उघड झाली असून, कंपनीतील 99 टक्के हिस्सा पार्थ पवार यांच्या नावावर असल्याचं समजतं. उर्वरित 1 टक्का वाटा असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर शीतल तेजवानी आणि अन्य आरोपींवरही कारवाई सुरू आहे. शीतल तेजवानी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं आहे. या समितीत आठ अधिकारी असून, प्रकरणातील सर्व जमीन व्यवहारांची सखोल तपासणी केली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या तपासाचा अहवाल एका महिन्यात सार्वजनिक होईल, असं सांगितलं आहे. तसेच पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावे झालेला जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.
या घोटाळ्यानंतर राजकीय वातावरण अधिकच चिघळलं आहे. विरोधकांनी पार्थ पवार यांच्यावर थेट कारवाईची मागणी केली असून, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसने याबाबत आवाज उठवला आहे. दोन्ही पक्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
धंगेकर यांनी म्हटलं आहे की, ‘कोंढवा जमीन व्यवहारात सगळी सिस्टीम फेल झाली आहे. काहींवर गुन्हे दाखल झाले, पण पार्थ पवार यांच्यावर कारवाई का नाही? जैन बोर्डिंग प्रकरणात आणि या व्यवहारात दुटप्पी धोरण का? असं ते म्हणाले. त्यांनी पार्थ पवार यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. धंगेकरांनी म्हटलं ‘चुकीला माफी नाही. पार्थ पवारांनी जमीन व्यवहारात गडबड केली आणि नंतर पैसे परत करण्याची भाषा केली. जैन बोर्डिंग आणि कोंढवा दोन्ही प्रकरणांची ED चौकशी झाली पाहिजे. वडिलांची सत्ता मुलगा वापरतो, पण आता त्यावर कारवाई झालीच पाहिजे. दादांचं ऐकणारा पक्षात कोणी नाही, मुलगाही नाही,” असा टोला त्यांनी लगावला.


