मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’चा भव्य ग्रँड फिनाले नुकताच संपला. होस्ट सलमान खानने विजेत्याची घोषणा करत प्रेक्षकांना थरारक क्षण दिला. ‘अनुपमाला’ फेम अभिनेता गौरव खन्ना हा शोचा विजेता ठरला असून, त्याने उपविजेते फरहाना भट्टला अटीतटीच्या स्पर्धेत मागे टाकले. या विजयासोबत गौरवला ५० लाख रुपयांचे बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली आहे.
शोच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या या हंगामात गौरव खन्ना, फरहाना भट्ट, तान्या मित्तल, प्रणित मोरे आणि अमाल मलिक हे पाच फायनलिस्ट होते. प्रेक्षकांच्या मतदानाने अमाल मलिक पहिला बाहेर पडला, त्यानंतर तान्या मित्तल आणि प्रणित मोरे यांना निरोप देण्यात आला. शेवटच्या टप्प्यात गौरव आणि फरहाना यांच्यातील लढत जबरदस्त ठरली, ज्यात गौरवने बाजी मारली.
ग्रँड फिनेलमध्ये पाचही स्पर्धकांनी जबरदस्त डान्स परफॉर्मन्स आणि इमोशनल मोमेंट्स सादर केले. फरहाना भट्टने पहिल्या आठवड्यातील वक्तव्य स्मरण करत गौरवच्या सहभागाबद्दल आभार मानले, तर गौरवने शोमधील त्याच्या शांत आणि रणनीतिक खेळाची प्रशंसा केली. या हंगामात मैत्री, भांडणे आणि ट्विस्ट्सने प्रेक्षकांना बांधून ठेवले.


