Pune News: शहरातील ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन पुरेसे न राहिल्यामुळे ग्रामीण भागात शेतीसाठी ओल्या कचऱ्याचा वापर होतोय, पण प्रत्यक्षात त्यात मिश्र कचरा मिसळला जात असल्याची गंभीर माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांना मिळाली आहे. त्यांनी या प्रकाराला गंभीर दखल घेत, अशा प्रकल्पांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
मंगळवारी पवनीत कौर यांनी घन कचरा विभागातील अधिकारी आणि कोठी कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ओल्या कचऱ्याच्या नियमनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. २००० मधील बांधकाम नियमावलीनुसार, हॉटेल, खानावळी, मंगल कार्यालये तसेच मोठ्या सोसायट्यांमध्ये ज्या ठिकाणी दररोज १०० किलो पेक्षा जास्त ओला कचरा तयार होतो, त्यांच्याकडून कचऱ्याची योग्य विल्हेवाट बंधनकारक आहे. सध्या शहरात अशा १,९४२ आस्थापना आहेत, ज्या दररोज सुमारे २० टन कचरा व्यवस्थापित करतात.
हेही वाचा – देवाची उरूळीतील 28 लाख टन कचरा हटवण्यासाठी महापालिकेची नवी योजना; एकाच वर्षात जागा मोकळी करण्याचा संकल्प
अतिरिक्त आयुक्त कौर यांनी सर्व आरोग्य निरीक्षकांना आदेश दिले की, त्यांनी आपल्या विभागातील अशा आस्थापनांची सातत्याने तपासणी करावी, नव्याने उभारण्यात आलेल्या आस्थापनांचे सर्वेक्षण करावे, तसेच ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसे केले जाते याचा सविस्तर अहवाल तयार करावा. याशिवाय, खाजगी आस्थापनांना कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे, असेही निर्देश दिले आहेत. शहरात खाजगी आस्थापनांना मार्गदर्शन करणाऱ्या १७ संस्था सक्रिय आहेत, ज्यांच्या माध्यमातून योग्य नियमन सुनिश्चित केले जाईल.
याशिवाय, लोणीकाळभोर येथील वन विभागाच्या जागेत ओला कचरा बेकायदेशीर पद्धतीने टाकल्याचे समोर आले आहे. वडाळेवस्ती परिसरात हजारो टन कचरा वन विभागाच्या जागेत टाकल्याची माहिती मिळाली असून, याप्रकरणी प्राथमिक तपासणीत दोषी आढळले आहेत. पवनीत कौर यांनी सांगितले की, पुढील दोन दिवसांत दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.


